Friday, November 2, 2012


प्रसिध्द साहित्यिक भीमसेन देठे यांच्या हस्ते दोन पुस्तकांचे प्रकाशन
स्थळ : - विद्या मंदिर, दहिसर 


अश्रू आणि हास्य यांचा सुरेख संगम म्हणजे जीवनायन. तर जीवनाचे अनेक भावकंगोरे उलगडणारा चारोळी संग्रह म्हणजे ‘रंगछटा’ आहे. स्त्रीकडे आणि स्त्रीत्वाकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन यात आहे आणि विशेष म्हणजे प्रकाशिका उषा रसाळ यांनी एका नवोदित उत्तम कवयित्रीच्या काव्य संग्रहांना मराठी साहित्य क्षेत्रात प्रवेश देऊन स्त्रीत्वाचा गौरव केला असे गौरवोद्‌गार भीमसेन देठे यांनी मनिषा बहिर-घेवडे लिखित ‘जीवनायन’ व ‘रंगछटा’ या दोन काव्यपुस्तकांचे प्रकाशन करताना काढले.

 समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य श्री. अनिल पेंढारकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ साहित्यिक भीमसेन देठे, शिवाजी रसाळ आणि वैजयंतीमाला मदने उपस्थित होते.

शिवाजी रसाळ यांनी काव्यपुस्तकांचे सुंदर समर्पक आणि अत्यंत मोजक्या शब्दांत विश्लेषण केले. जीवनायन हे केवळ कवयित्रीचे जीवन गाणे नसून समस्त नारी जगताचे गाणे आहे. स्वतंत्र शैली, वाचकाला अंतर्मुख करायला लावणा-या कविता तर दुस-या अंगाने जाब विचारणा-या कविता आहेत.

वसईच्या बहिणाबाई वैजयंतीमाला मदने यांनी स्त्री जीवनाचे, स्त्रीयांवर होणारे अत्याचार आणि स्त्रीचं जगणं यावर सुंदर भाष्य करुन श्रोत्यांच्या काळजाला हात घातला. साडी-चोळीने मनिषाचा सत्कार करुन तिला प्रेरणा व प्रोत्साहन दिले.

माध्यमिक मुख्याध्यापक संघटना (प.विभाग) चे अध्यक्ष संजय पाटील यांनी सुध्दा कवितांवर सुंदर भाष्य केले.

कवयित्री  पल्लवी बनसोडे, कवी सुनिल ओव्हाळ, स्वानंदचे संपादक शशिकांत पिंपळे, तसेच विद्या मंदिर शाळेचे मुख्याध्यापक अविनाश बेंडाळे, प्रा. सुनिल घेवडे आदि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन सिध्दार्थ गजभिये यांनी केले सुनंदा जोगी आणि शाळेचे विद्यार्थी यांनी  विशेष परिश्रम घेतले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.