Friday, September 7, 2012

सुजाण पालकत्व अहवाल 2012

पालक व विद्यार्थी यांच्या नात्यांची वीण घट्ट असेल तर आदर्श विद्यार्थी घडविणे सहज साध्य होते. यासाठी सध्याच्या व्यस्त आणि अनेक आव्हानांच्या युगात मुलांना वाढवताना येणाऱ्या समस्या व त्यावरचे उपाय याबाबत सर्वांगीण विचार होणे आवश्यक आहे आणि हाच उद्देश ठेवून विद्या प्रसारक मंडळातर्फे पालक-विद्यार्थी यांना अनुलक्षून अनेक उपक्रमांचे आयोजन होत असते. या अंतर्गत दरवर्षी प्रमाणे यावर्षीही ‘सुजाण पालकत्व’ हा उपक्रम राबविण्यात आला.

रविवार दि. 29/07/2012 रोजी सकाळी 9.00 वा. नवीन इमारतीच्या सभागृहात Jr.K.G./शिशुवर्गात प्रवेश घेतलेल्या आणि Sr.K.G./बालवर्गात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ‘सुजाण पालकत्व’ हा उपक्रम आयोजित केला होता. मुलांचा सर्वांगीण विकास योग्य तऱ्हेने व्हावा यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. सौ. अंजली भाटवडेकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे दहावे वर्ष होते.

उपक्रमाची सुरूवात प्रकल्प समन्वयक सौ. मेधाविनी कुलकर्णी यांच्या प्रास्ताविकाने झाली. बालोद्यानच्या मुख्याध्यापिका सौ. अमिता पंडित व इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सिसिलीया रॉड्रिग्ज यांनी पुष्पगुच्छ देऊन डॉ. मनोज भाटवडेकर व डॉ. सौ. अंजली भाटवडेकर यांचे स्वागत केले. प्रकल्प समन्वयक डॉ. मकरंद नाटेकर यांनी पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करून दिला. त्यानंतर प्रकल्प समन्वयक डॉ. सौ. वसुंधरा नाटेकर यांनी उपक्रमाची सूत्रे आपल्या हातात घेतली व प्रश्नोत्तराच्या स्वरूपात उपक्रमास सुरूवात झाली, त्याचा गोषवारा असा -

मूल वाढवणे ही जशी आनंदाची गोष्ट आहे तशीच ती जबाबदारी आहे. मूल वाढवतो तेव्हा आपणही पालक म्हणून वाढत असतो.‘मी’ ची जाणीव सुरूवातीला या वयात जाणवते. याच वयोगटात मुलांमध्ये शारीरिक व मानसिक बदल घडत असतात. शारीरिक विकासात शाळा घटक असते, शाळेतील शिक्षिका ही विद्यार्थ्यांची दुसरी आईच असते. या वयात शब्द संपत्ती कमी असल्याने आपल्या भावना हालचालींद्वारे व्यक्त होतात. उदा. - राग आल्यावर मूल शांत बसते. ‘खेळ’ हे प्रभावी माध्यम मुलांशी वागताना वापरलं पाहिजे. यासाठी पालकांनी मुलांसाठी वेळ दिला पाहिजे. खेळाद्वारे मुलांच्या मनातील भावना व्यक्त होतात. या वयात मुलांचा विकास होत असतो. उदा. - रंग ओळखतात, मोठ्या माणसांशी संवाद साधतात. या वयातील मुलांना लिखाणाची सक्ती करू नये. आपल्या मुलाची तुलना दुसऱ्या मुलाबरोबर करू नये, कारण प्रत्येक मूल हे वेगळे असते. मुलाच्या सतत मागे लागून एखादी गोष्ट करण्यास भाग पाडू नये.

शारीरिक वाढ नीट होण्यासाठी खाण्याबरोबरच घरातील वातावरण, निसर्गाशी जवळीक, परस्परांतील संवाद महत्त्वाचा आहे. मुलाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी चौरस आहार आवश्यक आहे. आपले भारतीय जेवण हे उत्तम चौरस आहार आहे. मुलांना जेवण देताना एकदम जबरदस्तीने न भरवता चार ते पाच वेळा थोडे थोडे खाण्यास द्यावे. मुलांना जंक फूड (कुरकुरे, मॅगी, इ.) देवू

नये कारण यात स्निग्ध पदार्थ व मीठ यांचे प्रमाण जास्त असते, पण त्यातून पोषक तत्त्वे मिळत नाहीत. चॉकलेट, गोळ्या, बिस्किटे, बेकरीचे पदार्थ देवू नयेत. मुलांनी न्याहारी करणे फार गरजेचे आहे. व्यवस्थित न्याहारी करून शाळेत गेल्यास शिकताना लक्ष केंद्रित होते. मुलांना चांगल्या सवयी लागण्यासाठी प्रथम पालकांनी तसे करावे.



मुलांना भूक लागण्याचे सर्वांत उत्तम टॉनिक म्हणजे त्यांना भरपूर खेळण्यास द्यावे, शारीरिक हालचाली भरपूर झाल्यास भूक चांगली लागते. मुलांना भूकेचे टॉनिक देवू नये. त्यांनी व्यवस्थित जेवावे यासाठी त्यांना अधेमधे  चॉकलेट, बिस्किटे, फरसाण इ. खाण्यास देवू नये. मुलांना भूक लागेल तेव्हाच जेवण्यास द्यावे. त्यांच्या मागे लागू नये. दूध हे 6 ते 8 महिने पूर्णांन्न आहे पण नंतर मुलांना योग्य तो आहारच द्यावा कारण फक्त दूध पिण्याने शरीराला त्याचा काही फायदा नसतो. (मूल गुटगुटीत दिसते पण त्याला आवश्यक ती जीवनसत्वे मिळत नाहीत.) दूधाऐवजी दही खाल्ल्यास चालेल.

मुलांना भूक लागत नाही याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे पालकांची भीती (काळजी) होय. कोणतेही निरोगी मूल उपाशी राहात नाही. भूक लागली की मूल जेवतेच. मुलांनी खायला हवे असेल तर त्याला खाताना आनंद वाटला पाहिजे. मुलांना सर्व अन्न पदार्थ खाण्याची सवय लावण्यासाठी सर्व प्रथम पालकांनी ते अन्न पदार्थ खाल्ले पाहिजेत. तसेच जेवताना सर्वांनी मिळून जेवले पाहिजे. या वयातील मुलांचे वजन शक्यतो 1 किलोच वाढते. काही महिने मुलाची उंची आहे तितकीच असते तर कधी एकदम वाढते. मुलाची शारीरिक हालचाल व्यवस्थित होत असेल, तो वारंवार आजारी पडत नसेल तर काळज़ी करण्याचे कारण नाही. पण जर वजन सतत कमी होत असेल तर लगेचच डॉक्टरांना दाखवावे.

बुध्दी ही प्रत्येक मुलाची वेगळी असते. बुध्दीचा विकास हा प्रत्येक मुलात वेगळा असतो. मुलाची आवड, क्षमता, कौशल्य यांचा अंदाज आल्यानंतर त्यांच्या बुध्दीला त्या त्या प्रकारचे खाद्य पुरवावे. उदा. - मुलाला जर गाणं आवडत असेल तर त्याला चांगली गाणी ऐकवावीत. ज्या गोष्टीची मुलाला आवड आहे ती गोष्ट मुलाला करू देत पण त्याला स्पर्धेच्या चक्रात ढकलू नये. लहान वयात स्पर्धा ही व्यक्तिमत्वाला मारक आहे, स्पर्धेमुळे ईर्षा, असूया या गोष्टींची बीजं नकळत मुलांच्या मनात रूजवली जातात. बुध्दीच्या विकासात आनंद महत्त्वाचा आहे. बुध्दीचा विकास चांगला होण्यासाठी पालकांनी मुलांसाठी भरपूर वेळ दिला पाहिजे. मुलांना खेळणी देतानाही त्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळेल अशीच खेळणी द्यावीत. जर आपण आणलेली खेळणी मुलाने बाजूला ठेवली तर पालक़ांनी मुलांना त्याच खेळण्याशी खेळण्याचा आग्रह धरू नये.

आपली मुले ही आपलीच छोटी प्रतिमा असते. टी. व्ही. ही आपली सोय असते. बेडरूममध्ये टी. व्ही. नसावा, झोपताना टी. व्ही. पाहू नये कारण टी. व्ही. वरील हिंसक दृश्ये, लैगिकता यांचा मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होतो. मुले झोपेतून ओरडत उठतात. टी. व्ही. हे सर्वात दृश्य माध्यम आहे. टी. व्ही. वरील ठराविक कार्यक्रम, ठराविक वेळेत बघण्यासंदर्भात मुलांशी चर्चा करावी. जेवताना टी. व्ही. लावू नये, कारण याचा संबंध लठ्ठपणा व इतर आजार यांच्याशी आहे. दिवसातून जास्तीत जास्त 1 तास टी. व्ही. पाहावा. मुलांचा शारीरिक खेळ झाल्याशिवाय मुलांना टी. व्ही. लावू देवू नये.

झोपेची प्रत्येकाची गरज वेगळी असते, पण बहुतेककरून मुलांना 8 ते 10 तास झोप हवी. झोपायच्या आधी घरात आपापसात वादावादी करू नये. कारण जर वातावरण खेळकर प्रसन्न असेल तर मुल निवांत झोपते, झोपण्या अगोदर मुलांना मंद संगीत ऐकवावे. मुलाला झोपेच्या विचित्र सवयी लावू नयेत. उदा. - मुलांना कुशीत, छातीवर घेऊन झोपणे.

मुलांशी फक्त खूप बोलणे म्हणजे सुसंवाद नव्हे तर भरपूर ऐकणे म्हणजे संवाद होय.  मुलांच्या शब्दांच्या मागे असलेल्या भावना आपल्याला ओ़ळखता यायला हव्यात. मुलांशी बोलताना



नेमकेपणाने बोलावे, मुलांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे, मुलांची भावनिक बुध्दिमत्ता वाढवायची असेल तर सुसंवाद आवश्यक आहे.

एखाद्या गोष्टीबद्दल राग आल्यावर तो दडपण्यापेक्षा व्यक्त करावा. मुलांना राग आल्यानंतर आपण शांत राहावे, काही काळानंतर आपल्याला राग आला आहे हे त्याला सांगावे, परत असे करू नकोस हे त्याला स्पष्ट सांगावे, मुलाला राग का आला आहे हे जाणून घ्यावे. राग, भीती, आनंद, दु:ख या चार मूलभूत भावनिक गरजा आहेत.

मुलांना शिस्त लागण्यासाठी प्रथम आपण स्वत:ला तशी शिस्त लावली पाहिजे. शिस्त ही वातावरणात असली म्हणजे मुले शिस्तित वागतात. शिस्त लावताना काय करू नये, काय करावे हेही सांगावे. मुलांना शिक्षा कधीतरी करावी, शिक्षा करण्याआधी प्रथम मुलाला त्याचे काय चुकले आहे हे सांगावे. शिक्षा म्हणून आपण जर मुलांशी अबोला धरला तर त्याचा परिणाम मुलांवर जास्त होतो. जेव्हा मूल आक्रमक होते तेव्हा आपण आक्रमक होवू नये, जे पालक खंबीर असतात त्यांच्या नियमांचे उल्लंघन होत नाही. पण जे पालक मवाळ असतात त्यांच्या नियमांचे पालन होत नाही.

लहान वयात मुलांना वाचण्याची आवड लावण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके आणून द्यावीत, आपणही त्यांच्या सोबत वाचन करावे. वाचनामुळे शब्दसंपत्ती वाढते, मुलांना पुस्तक  प्रदर्शनाला घेऊन जावे. आपण नोकरी करतो म्हणून मुलाला पाळणाघरात राहावे लागते याची खंत बाळगू नये व त्याची भरपाई म्हणून मुलांना महागड्या वस्तू देऊ नयेत. त्याऐवजी मुलांना  वेळ द्यावा.

लैंगिक शिक्षण आवश्यक आहे हे निर्विवाद सत्य आहे. मुलांच्या शरीरातील गुप्त भाग मुलांना सांगावेत, ‘जर त्याला कोणी हात लावत असेल तर आम्हाला सांग’ तसे त्याला सांगावे. या वयात अतिचंचलता ही वर्तणूक समस्या असू शकते, ही समस्या मेंदूतील बिघाडाशी संबंधीत आहे, त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व योग्य तो उपचार करावा.

या नंतर काही पालकांच्या प्रश्नांना डॉक्टरांनी उत्तरे दिली. सर्व पालकांना जाताजाता दोन्ही डॉक्टरांनी एक संदेश दिला की आपले मूल जसे आहे तसे स्वीकारल्यास पालकत्व ही आनंदाची गोष्ट होऊ शकते.

त्यानंतर बालोद्यान शिक्षिका सौ. कल्पिता वर्तक यांनी सर्वांचे आभार मानले व उपक्रमाचा समारोप करण्यात आला.

एकूणच या उपक्रमाच्या निमित्ताने पालकांच्या मनातील अनेक समस्यांचे निराकरण होण्यास खूपच मदत झाली आणि तशी भावना पालकांनी बोलूनही दाखवली. पालक आणि पाल्य यांच्या सुदृढ नात्यावरच शाळेतील त्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा आलेख ठरत असल्याने या उपक्रमाने विद्यार्थांना समजून घेण्यास पालकांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले याबद्दल सर्व पालकांनी वि. प्र. मंडळाचे मनापासून आभार मानले. पालकांप्रमाणेच मान्यवर डॉ. श्री. व सौ. भाटवडेकर यांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले. आजच्या धावपळीच्या जीवनात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनापासून प्रयत्न करणाऱ्या वि. प्र. मंडळाचे त्यांनी आभार मानले.

 

बालोद्यान शिक्षिका

  कु. संगिता तांबे